राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, या टप्प्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यानंतर शिक्षण संस्थांनी निवडलेल्या भरती पद्धतीनुसार पुढील प्रक्रिया राबवली जाईल. विनामुलाखत पर्याय निवडलेल्या संस्थांना त्यांच्या रिक्त जागांइतकेच उमेदवार पोर्टलमार्फत पाठवले जाणार आहेत,
तर मुलाखतीचा पर्याय निवडलेल्या शाळांना प्रत्येक रिक्त जागेसाठी दहा उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. त्यानंतर गुणवत्ता, संवर्ग व विषयाच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक भरतीसाठी ६० खासगी शिक्षण संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिराती दाखल केल्या आहेत. एकूण २१२ रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांनी आपली स्वप्रमाणपत्रे मार्चअखेरपर्यंत पोर्टलवर सादर केली होती.
त्यानंतर शाळांना जाहिरात सादर करण्यासाठी मुदत दिली गेली. सदर सर्व जागा खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील असून, जिल्हा परिषदेतील रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया मात्र रोस्टर तपासणी अद्याप पूर्ण न झाल्यामुळे रखडली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE