NMMC नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६२० रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, महापालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल पुढील सूचना मिळेपर्यंत जाहीर करू नये. ही भरती काही महिन्यापूर्वी महापालिकेने आयोजित केली होती. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC Bharti 2025) आधीपासूनच ७३ कर्मचारी ठोक मानधनावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. डिसेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या कर्मचाऱ्यांचा विचार करायला सांगितला होता. पण, ज्या कर्मचाऱ्यांची जाहिरात आणि मुलाखत झाली नाही, त्यांना सेवेत घेऊ नये, असे शासनाच्या २००६ च्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने या परिपत्रकाचा आधार घेतला.
महापालिकेतील ६६८ पदांसाठी १६, १७, १८ आणि १९ जुलै २०२५ रोजी परीक्षा झाली. यासाठी ८४,७७४ अर्ज आले होते. उमेदवारांना सोपे जावे म्हणून १२ जिल्ह्यांमध्ये २८ परीक्षा केंद्रे होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेमधील ४८ पंप ऑपरेटरला कायम सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांचा २००६ पासून न्यायालयीन लढा सुरू होता. औद्योगिक न्यायालयाने आधी निर्णय दिला होता, ज्याला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने महापालिकेला यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेविरोधात महापालिकेत कार्यरत असलेल्या करारपद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेस नोकर भरतीचा निकाल ( स्कोर बोर्ड) तूर्तास जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी येत्या २३ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पालांडे यांनी दिली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE