Nagarpur Bank Exam Results in Controversy; Committee Alleges Major Scam : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निकालावर घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने यावर आपला संताप व्यक्त केला आहे. समितीने ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रमुख राजकीय नेत्यांना टॅग करत या प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली आहे.
समितीचा आरोप आहे की, या परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून, काही राजकीय हस्तींनीच या प्रकाराला पाठीशी घातले आहे. विशेष म्हणजे, निकालात निवड झालेल्या उमेदवारांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाहीत, जी गोष्ट पारदर्शकतेच्या दृष्टीने गंभीर आहे.
समितीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जर महाराष्ट्रात आजही अशा प्रकारचे भरती घोटाळे सुरू असतील, तर परीक्षा घेण्याचा काहीच उपयोग नाही. निदान प्रामाणिक विद्यार्थ्यांची वर्षं तरी वाया जाणार नाहीत. हे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही माहिती आहे, पण दोघंही गप्प का आहेत? कारण काही जिल्ह्यातील बँका विरोधकांच्या हातात आहेत. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा पद्धतीने हा प्रकार दडपला जात आहे.”
यामध्ये सर्वसामान्य, ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. “त्यांच्याकडे १५ लाख कुठून येणार? त्यांना पैसे द्यायला जमणार नाही, त्यामुळे तेच या सगळ्या सिस्टिममध्ये भरडले जात आहेत,” असा संताप समितीने व्यक्त केला आहे.
आणखी गंभीर बाब म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांची यादीही अद्याप जाहीर न झाल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “जर ही नावे समोर आली, तर संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की नेमका घोटाळा किती खोलवर आहे,” असे समितीने म्हटले आहे.
समितीने थेट आमदार रोहित पवार यांना टॅग करत म्हटले आहे की, “आपण आमदार असलेल्या जिल्ह्यातील बँकेत एवढा मोठा घोटाळा झाला आहे. कृपया याकडे लक्ष द्या. विरोधक हे सत्ताधाऱ्यांचे गैरकारभार उघड करण्यासाठी असतात, ते काम करा.”
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE