Professor recruitment will soon take place in the state : लवकरच महाराष्ट्रात होणार प्राध्यापक भरती ! सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. वित्त विभागाने या प्रस्तावावर काही त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या आहेत, आणि त्या लवकरच पूर्ण करून भरती प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत विरोधी पक्षातील आमदार विधान परिषदेत आक्रमक झाले. त्यानंतर राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ४,४३५ रिक्त सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आले आहे. वित्त विभागाने काही त्रुटींची सूचनाही केली असून त्या लवकरच दूर करून भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल, अशी माहिती इंद्रनील नाईक यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील ११ सार्वजनिक विद्यापीठे आणि १,१७२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण ३६,७६३ पदे मंजूर आहेत. त्यात २१,२३६ पदांवर प्राध्यापक कार्यरत आहेत, तर १२,५२७ सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लागू करणे आणि ‘नॅक’ला समोर जाण्यासाठी १००% पदे भरली जावीत. प्राध्यापकांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्यामुळे महाविद्यालयांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्यासाठी प्राध्यापकांची भरती अत्यंत आवश्यक आहे. सध्या प्रत्येक महाविद्यालयात साधारणत: ४०% पदे रिक्त आहेत. तसेच, SET, NET, आणि पीएचडी धारकांच्या बेरोजगारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे या रिक्त जागा कधी भरल्या जातील आणि किती वेळेत भरल्या जातील, असा प्रश्न पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे काँग्रेस आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
विधान परिषदेत दिलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना इंद्रनील नाईक यांनी सांगितले, “प्रा. आसगावकर यांनी मांडलेला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्राध्यापक भरती संदर्भात शासन स्तरावर काही प्रक्रिया सुरू आहेत. हा विषय वित्त विभागाकडे काही महिन्यांपासून प्रलंबित होता. त्यानंतर काही त्रुटी असल्याचे वित्त विभागाने कळवले आहे. त्या त्रुटी लवकर दूर करून प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली जाईल.”
या लक्षवेधी सूचनेला विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांच्यासोबतच सदस्य सत्यजित तांबे, विक्रम काळे आणि अभिजीत वंजारी यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्यामुळे, जर या भरती प्रक्रियेला गती मिळाली, तर अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE