मोठी बातमी महाराष्ट्रात 10,000 हून अधिक शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, TAIT पात्र उमेदवारांची निवड यादी 20 मेपूर्वी जाहीर होणार
महाराष्ट्रातील शिक्षक भरती संदर्भात एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 2022 मध्ये घेण्यात आलेल्या TAIT परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी येत्या 20 मे 2025 पर्यंत जाहीर होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून नियुक्तीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो पात्र उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवली जाणारी शिक्षक भरती मोहीम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण 10,388 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्यातील खाजगी व्यवस्थापनातील 111 शाळांमधील 1,976 पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत.
20 मेपूर्वी मुलाखतीविना भरतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर खाजगी शाळांमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखतींचे आयोजन केले जाईल. सर्व प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण करून अंतिम नियुक्ती यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होण्यापूर्वी नवीन शिक्षक शाळांमध्ये रुजू होतील, असा शासनाचा मानस आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 मे होती, मात्र आता ती 14 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
यंदाच्या परीक्षेसाठी D.Ed, B.Ed आणि M.Ed च्या अंतिम सत्रात असलेले किंवा अंतिम परीक्षेला बसलेले विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत. मात्र, 05 मे 2025 पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना या नव्या अटींचा लाभ घ्यायचा असल्यास, त्यांना पुन्हा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल, आणि नव्याने भरलेला अर्ज अंतिम समजला जाईल, अशी स्पष्ट माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE