राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘आनंददायी शनिवार’ (Happy Saturday) हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवी पद्धतीने कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे मूल्य थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असून, राष्ट्रनिर्मितीकडे एक सशक्त पाऊल पडणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
मंत्रालयात या उपक्रमाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमाअंतर्गत सेवानिवृत्त सैनिकांच्या मार्गदर्शनातून शाळांमध्ये खालील उपक्रम प्रभावीपणे राबवले जाणार आहेत
कवायती व शारीरिक प्रशिक्षण
ऐतिहासिक सहली व युद्ध संग्रहालयांना भेटी
प्रेरणादायी व्याख्याने आणि माहितीपट
सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
सैनिकी अनुभवाची विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारी अनोखी संधी
राज्यात दरवर्षी सुमारे ५,००० सैनिक सेवानिवृत्त होतात. या उपक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडक, गुणवत्तापूर्ण आणि स्वयंसेवी माजी सैनिकांची यादी तयार करण्यात येणार आहे. याच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना सैनिकी जीवनाची मूलभूत ओळख मिळणार आहे.
प्रायोगिक तत्वावर सुरुवात, नंतर राज्यभर विस्तार
सुरुवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर काही शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा राज्यातील सर्व शाळांमध्ये विस्तार करण्याबाबतचे आदेश जारी केले जातील. शालेय जीवनात देशसेवेचे बीज रोवण्याचा आणि सशक्त राष्ट्र घडवण्याचा हा उपक्रम एक महत्त्वाकांक्षी पाऊल असून, तो आता प्रत्यक्षात येत असल्याचा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचेही दादा भुसे यांनी नमूद केले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE