महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील १२ हजार ५३४ प्राध्यापकांच्या पदांपैकी १ हजार ३६८ पदे रिक्त आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने ६६९ पदे भरण्यासाठी २०१९ यावर्षी मान्यता दिली होती. परंतु एवढ्या सहा वर्षांपासून यातील एकही पद भरण्यात आले नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या प्राध्यापक भरती बाबत माहिती घेणयासाठी अर्ज केल्यावर हे धक्कादायक सत्य समोर आले.
राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाच्या गप्पा मारत असताना , बऱ्याच विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असल्याने दर्जेदार शिक्षण हे दिवास्वप्न ठरले आहे.
विद्यापीठांचा दर्जाही खालावत असल्याचे दिसून येते. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यांच्यासह इतर विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक २११ मुंबई विद्यापीठामध्ये, १९१ रिक्त पदे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असून त्यापाठोपाठ १६० रिक्त पदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आहे.
एसएनडीटी, मुंबई विद्यापीठामध्ये १२९, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात १२४ तर छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही संख्या १२८ इतकी आहे. विशेष म्हणजे, ७ ऑगस्ट २०१९ साली एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के पद भरण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती.
मात्र, त्यातील एकही पद भरण्यास विद्यापीठांना यश आले नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दीड वर्षांपूर्वी ९२ पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र, त्या जाहिरातीमध्ये विद्यापीठाने ‘एलआयटीयू’ विद्यापीठातील विभागांच्या पदांचा समावेश केला होता. त्यामुळे काही दिवसांनी ती जाहिरात रद्द करण्यात आलेली होती.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE